उजनी धरणात पाण्याचा महापूर; प्रशासन सज्ज, गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरण ७०% भरले; १६ दरवाजे उघडले, भीमेच्या काठावरील गावांमध्ये चिंता

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर
सोलापूर जिल्ह्याच्या जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणात मागील काही दिवसांतील दमदार पावसामुळे पाण्याचा मोठा साठा झाला आहे. सध्या धरण ७० टक्के क्षमतेने भरले असून, पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे भीमा नदीच्या पात्रात १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्या ३६ दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे धरणात तब्बल ४८.८० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड मार्गे धरणात ६७ हजार क्युसेक्स पाण्याचा प्रवाह सुरू आहे. हा मोठा प्रवाह पाहता उजनी धरणाची पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवणे हे पाटबंधारे विभाग व प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
प्रशासन सज्ज, नागरिकांना इशारा
पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासन धरणातील पाणीसाठा येत्या १० जुलैपर्यंत ७० टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचे नियोजन करत आहे. मात्र, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागू शकतो. त्यामुळे भीमा नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खालील सूचना देण्यात आल्या आहेत
➡ नदीपात्रात प्रवेश करू नका
➡ गुरेढोरे आणि इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा
➡ प्रशासनाच्या सूचना आणि इशाऱ्यांचे पालन करा
➡ आपत्ती व्यवस्थापन पथकाला सहकार्य करा
आपत्ती व्यवस्थापन सज्ज
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क आहेत. नदीपात्रात पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही जोखीम पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक त्या उपाययोजना वेळेत राबविल्या जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिली.



