“लाडकी बहीण योजना बंद केली तर दहा योजना चालू करता येतील”, शिवसेनेच्या माजी मंत्र्याचे वक्तव्य

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी टीका केली आहे. याचबरोबर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनीही विधानसभेत बोलताना, हळूहळू सरकार लाडकी बहीण योजनेतून दहा लाख महिलांना कमी करणार असल्याचा दावा केला आहे.
अशात आता माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कमद यांनी, “एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना चालू करता येतील की”, असे म्हटले आहे. कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
“शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना चालू कराव्या लागतात, अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहीलं, तर ते तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील की”, असे रामदास कदम म्हणाले.