आटपाडीताज्या बातम्या

आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. १५ मधून भाजपच्या मनीषा पाटील विजयी

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील निवडणूक निकाल जाहीर झाला असून, या प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या मनीषा आबासाहेब पाटील यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी एकूण ४१० मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेतली. या प्रभागात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताई रावसाहेब माळी यांना ३८१ मते मिळाली, तर शिवसेनाच्या अर्चना मनोज नांगरे यांना ३३८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार अनुराधा हणमंतराव शिंदे यांनी १८७ मते मिळवत लक्षणीय मते घेतली. NOTA ला एकूण ६ मते नोंदवली गेली.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये चार प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होती. शेवटच्या फेऱ्यांपर्यंत मतमोजणीमध्ये चढ-उतार दिसून आले. मात्र अंतिम फेरीत भाजपच्या मनीषा पाटील यांनी आघाडी कायम राखत विजय निश्चित केला. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

विशेष म्हणजे, या प्रभागात शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख मनोज नांगरे यांच्या पत्नी अर्चना मनोज नांगरे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या निकालाकडे राजकीयदृष्ट्या विशेष लक्ष वेधले गेले.

विजयानंतर मनीषा पाटील यांनी मतदारांचे आभार मानत, प्रभागातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नागरी विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. एकूणच प्रभाग क्रमांक १५ मधील निकालाने आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत राजकीय रंगत अधिक वाढवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button