उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समोर गावकरी आक्रमक म्हणाले, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून अटक करा
माणदेश एक्सप्रेस न्युज : बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट आहे. महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव प्रकरणाशी जोडलं जात आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा देखील आरोपी केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मस्साजोग येथे जाऊन देखमुख कुटुंबियांची भेट घेतली. तेथे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. आता मराठा बांधवांनी देखील अशीच मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
मराठा बांधवांनी निवेदनात काय म्हटलं?
“मराठा सरपंच बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निर्घृण हत्या झाली. सदरची हत्या ही केवळ संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत व त्ंयाचा सर्वात मोठा अडसर हा आपले पक्षाचे आमदार व मंत्री धनंजय मुंडे या नेत्याला होत होता. म्हणून सदरील नेत्याने इतर गुंडामार्फत म्हणजेच वाल्मिक कराड व इतरांच्या मार्फत हत्या केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या हत्येमधील जेवढे गुन्हेगार व गुन्हेगारांचा नेता धनंजय मुंडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. सदरील गुन्हांचा तपास जलद गतीने व्हावा.”